Categories

Most Viewed

24 सप्टेंबर 1944 भाषण

“आपल्या धार्मिक, सामाजिक व राजकीय आयुष्याचा पाया बुद्धिवाद हाच असला पाहिजे.”

तारीख 24 सप्टेंबर 1944 रोजी सकाळी 10 वाजता मद्रास येथे प्रभात टॉकीजमध्ये रॅशनल सोसायटीच्या विद्यमाने, श्री. एस. रामनाथ यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

अध्यक्ष महाराज, बंधु आणि भगिनींनो,
मी नुसता राजकारणी असल्यामुळे वाड्मय, इतिहास व तत्त्वज्ञान यावर अधिकाराने बोलू शकत नाही. पण मी वाड्मय, इतिहास व तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून जे मत बनविले, ते आज तुम्हाला सांगणार आहे.

हिंदुस्थानच्या इतिहासासंबंधी पुष्कळ गैरसमज रूढ आहेत. पुष्कळ विद्वान इतिहासकारांनी म्हटले आहे की. हिंदुस्थानात राजकारणाचा काही गंधच नव्हता. प्राचीन भारतीयांनी केवळ तत्त्वज्ञान, धर्म व अध्यात्म याविषयी लिहिण्याकडेच लक्ष दिले होते व ते इतिहासापासून राजकारणापासून साफ अलिप्त होते. असेही म्हणतात की, हिंदी जीवन व समाज एका ठराविक पोलादी चौकटीमध्येच फिरत आहेत व त्या चौकटीचे वर्णन केले की इतिहासकाराचे काम संपले ! हिंदुस्थानचा प्राचीन काळचा इतिहास अभ्यासल्यानंतर माझे मत मात्र ह्या विद्वानांहून अगदी निराळे बनले आहे. ह्या अभ्यासात मला आढळून आले आहे की, जगात कुठल्याही देशात हिंदुस्थानसारखे प्रचंड गतिमान राजकारण नव्हते. हिंदुस्थान हा बहुधा एकच देश असा आहे की, जेथे जगात दुसरीकडे कोठेही दिसली नाही अशी क्रांती घडून आली होती.

हिंदी इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी एक मूलभूत गोष्ट – ज्याचा इतिहासकारांना साफ विसर पडलेला दिसतो. नेहमी ध्यानात घेतली पाहिजे, ती म्हणजे प्राचीन हिंदुस्थानात घडलेला बौद्ध व ब्राह्मण यामधील लढा. याचा इतिहास काही प्रोफेसरांनी म्हटल्याप्रमाणे हा केवळ एखादा पंथामधला मामुली लढा नव्हता. सत्य म्हणजे काय यासाठी तो लढा होता.

बुद्धाने सत्याची व्याख्या अगदी सोप्या शब्दात सांगितली होती. इंद्रियांना कळू शकेल तेच सत्य होय. दुसऱ्या भाषेत सांगावयाचे म्हणजे कुणी अधिकारी व्यक्तीने सांगितलेली वस्तूच सत्य, असे नाही. उलट ब्राह्मणांचे म्हणणे असे की, जे वेदाप्रमाणे तेच सत्य (हास्य). बौद्ध क्रांतिकारक होते आणि ब्राह्मण प्रतिगामी. सध्या आपण प्रतिगामी लोकांच्या वर्चस्वाखाली आहोत. वेद वाचल्यानंतर मला मोठे आश्चर्यच वाटले. त्यात विदूषकी बडबडीखेरीज दुसरे काही नाही. (प्रचंड हास्य व टाळ्या) अशा ह्या पुस्तकांनाच प्रमाणग्रंथ मानण्याचा आग्रह ब्राह्मणांसारखे हुशार लोक का धरतात ? अथर्ववेदात तर निव्वळ ‘जादुई मंत्र आहेत ! (हास्य व टाळ्या).

जर इस्लाम धर्माने ह्या देशात पाऊल टाकले नसते तर आणखी फार काळ हा ब्राह्मण आणि बौद्धातला लढा चालला असता. जगाच्या इतिहासात स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाचा आदेश देणारा बुद्ध हाच पहिला मनुष्य निघेल. तो आदेश नष्ट झाला आहे. त्याचीच आज हिंदू समाजाला सर्वात जास्त जरूरी आहे. तो आदेश नष्ट झाला कारण क्रांतीविरुद्ध प्रतिक्रांतीने विजय मिळविला.

पुष्कळ लोकांना भगवदगीता हा फार मोठा धार्मिक ग्रंथ वाटतो. मोठ्या खेदाने मला म्हणावे लागते की तसे वाटण्यासारखे मला तरी त्या पुस्तकात काही आढळले नाही. याउलट त्या ग्रंथाने बराच अनर्थ केला आहे. ज्या बुद्धीच्या कसोटीला उतरू शकणार नाहीत, अशा गोष्टींना तात्त्विक आधार देण्याचा प्रयत्न त्यात केला आहे.

शेवटी राजकारण, समाज, राज्य शासन, धर्म व बुद्धिवादात ज्या क्रांतीची बुद्धाने मुहूर्तमेढ रोवली ती पुढे निष्फळ ठरली. धर्म व राजकारण यांना एकत्र जुंपून, चातुर्वर्ण्य ही केवळ सामाजिक प्रथा नाही. ते एक राजकीय तत्त्वज्ञान आहे, असे सिद्ध करण्यासाठी मनुस्मृती लिहिण्यात आली.

आपल्या सामाजिक व राजकीय आयुष्याचा पाया बुद्धिवाद हाच असला पाहिजे. प्रत्येक देशात राजकीय पुढाऱ्याची कसोटी पाहिली जाते. गांधींकडे पाहा. पण त्यांना तशी कसोटीच कुणी लावत नाही. ते म्हणतील ते खरे. दोन वर्षापूर्वी गांधी म्हणाले पाकिस्तान हे पाप आहे. सर्व काँग्रेसवाल्यांनी त्यांची री ओढली. आज गांधी म्हणतात, पाकिस्तान पाप नाही. मुसलमान मागतील तर ते दिले पाहिजे आणि काँग्रेसवाले आता त्याचीही री ओढतात. आपल्या सामाजिक, राजकीय व बौद्धिक जीवनात बुद्धिवादाला कसा फाटा देण्यात येतो याचे हे एक उदाहरण आहे. ह्या परिस्थितीचा जर अंत झाला नाही तर देशावर मोठे गंडांतर आल्याशिवाय राहाणार नाही.

सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 09 डिसेंबर 1944 रोजी प्रसिद्ध झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password