“साम्राज्यशाही, भांडवलशाही, जमीनदारशाही आणि मध्यमवर्गीय हिंदी व्यापारी यांच्या दडपणातून राष्ट्राला मुक्त करणे हेच संपूर्ण स्वातंत्र्य”
स्वतंत्र मजूर पक्षाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची सभा तारीख 21 मार्च 1939 रोजी मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. यावेळी पक्षाचे ध्येय संपूर्ण स्वातंत्र्य असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
आमचा पक्ष श्रमजिवी वर्गाचा आहे. परकीय साम्राज्यशाही, हिंदी भांडवलशाही व जमीनदारशाही आणि मध्यमवर्गीय हिंदी व्यापारी यांच्या दडपणाखाली श्रमजिवी वर्ग दबला आहे. त्याची या बिकट परिस्थितीतून मुक्तता करणे हिंदी राष्ट्राला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय अशक्य आहे. संपूर्ण स्वातंत्र्याचे आमचे ध्येय शुद्ध स्वरूपाचे आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरू झालेल्या कोणत्याही लढ्यात आपला पक्ष प्रामुख्याने भाग घेईल. तोपर्यंत गोरगरीब बहुजन समाजाची पिळवणूक करणाऱ्या आमच्याच देशबांधवांशी आम्ही आमचे निशाण उभारू.